20130522

मूकं करोति वाचालं



पीटीआय, काठमांडु
Published: Wednesday, May 22, 2013
आठ हजार ८४८ मीटर उंचीवर यशस्वी चढाई

काही गुंडांनी चालत्या ट्रेनमधून फेकल्यामुळे एक पाय गमावलेल्या माजी राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू अरुणिमा सिन्हा हिने नवीन इतिहास रचला आहे. जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी ती पहिली अपंग भारतीय ठरली आहे.

टाटा समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या  इको एव्हरेस्ट मोहिमेअंतर्गत अरुणिमा मंगळवारी सकाळी १०.५५ ला ८ हजार ८४८ मीटर उंचीच्या हिमालयाच्या सर्वोच्च टोकावर पोहोचल्याची माहिती नेपाळ पर्यटन मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी दिली.

उत्तर प्रदेशची रहिवासी असलेली अरुणिमा १२ एप्रिल २०११ रोजी लखनऊ येथून दिल्लीला जात असताना काही गुंडांनी तिला पद्मावती एक्स्प्रेसमधून बाहेर फेकले होते. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अरुणिमाच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी डावा पाय गुडघ्यापासून काढून टाकला.

या मोहिमेवर निघण्याआधी वृत्तवाहिन्यांशी बोलताना अरुणिमा हिने सांगितले की, मी रुग्णालयात असताना प्रत्येकाला माझी काळजी वाटत होती. मात्र माझ्याकडे दयेने बघू नये यासाठी काहीतरी वेगळे करण्याचा विचार माझ्या मनात घर करून होता. त्यामुळे जेव्हा एव्हरेस्ट मोहिमेबद्दल माहिती मिळवली, तेव्हा माझा भाऊ आणि प्रशिक्षकांना सांगितले. त्यांनीही मला प्रोत्साहन दिल्याचे तिने सांगितले.

गेल्या वर्षी उत्तरकाशी येथील शिबिरात अरुणिमा, टाटा स्टील  ऍडव्हेंचर फाऊंडेशनशी जोडली गेली. तिथे, एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला असलेल्या बचेंद्री पाल यांनी तिला प्रशिक्षण दिले होते. गेल्या वर्षी ६ हजार ६२२ मीटर उंचीचे लडाखमधील छामसेर कांग्री हे उंच शिखर तिने काबीज केले. मात्र एव्हरेस्ट सर करण्याची तिची इच्छा होती.

-----------------------------------------------------------------------------------------------------------

मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं ।
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्द माधवम्‌ ॥

 ज्यामुळे मुखर हो मूक, चढे पंगू शिखरावरी ।
ज्याचिया प्रसादे घडते हे, वंदू मोदद श्रीहरी ॥

-----------------------------------------------------------------------------------------------------------

रोज खिन्न करणार्‍या वृत्तांनी भरलेल्या वृत्तपत्रांत आज अत्यंत उत्साहजनक वृत्त दिसून आले. अरुणिमा सिन्हाने सागरमाथा शिखरास गवसणी घातली.

लहान-सहान अपयशांनी, अपघातांनी, निराशाजनक वृत्तांनी हताश होणार्‍यांना उमेदीचे नवे आकाश दाखवणार्‍या अरुणिमास, मानाचा मुजरा! तिच्या दैदिप्यमान यशाने लाखो निराश मनांना उज्ज्वल भविष्याचे वेध लागोत हीच प्रार्थना!!

संदर्भः लोकसत्ता २०१३-०५-२२

20130403

ओज-शंकराची कहाणी

श्री. शंकर दिनकर उपाख्य भैयाजी काणे 

(जन्मः ६ डिसेंबर १९२४, वरवडे, रत्नागिरी –
मृत्यूः २६ ऑक्टोंबर १९९९, कोल्हापूर) 

हे न्यू तुसॉम, जिल्हा उख्रूल, मणीपूर राज्य, भारत, ह्या त्यांच्या कर्मभूमीत, ओज-शंकर म्हणून ओळखले जातात. तिथे, पूर्व-सीमा-विकास-प्रतिष्ठानतर्फे स्थापन करण्यात आलेल्या ओज-शंकर विद्यालयाच्या स्वरूपात, आज त्यांचे कार्य दिमाखाने उभे आहे. शिक्षणाद्वारे राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या त्यांच्या जीवनव्यापी ध्यासाचेआज एका मोठ्या चळवळीत रूपांतरण झालेले आहे. त्या त्यांच्या भरतभूस ललामभूत ठरलेल्या कार्याची ही कहाणी आहे.

भैयाजींचे प्राथमिक शिक्षण पुण्यात आणि माध्यमिक शिक्षण सातार्यात झाले. ते १९४० साली शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. १९४२ ते १९४४ अशी दोन वर्षे त्यांनी इंडियन एअर फोर्समध्ये ग्राऊंड इंजिनिअरिंग कोर्प्समध्येलाहोरकोलकाता व सिकंदराबाद येथे नोकरी केली. १९४४ साली नोकरी सोडून त्यांनी पुण्यात सर परशुरामभाऊ महाविद्यालयात नाव नोंदवले. १९४६ साली ते संस्कृत विषय घेऊनविशेष प्राविण्यासह बी.ए. झाले. पुढे बी.एड. आणि एल.एल.बी.ही झाले.

१९४८ साली संघावर बंदी आली होती तेव्हा भैयाजी सहा महिने तुरूंगात गेले. १९५० मध्ये ते संघाचे पूर्णवेळ प्रचारक झाले. १९५८ पर्यंत एकूण आठ वर्षे मंगलोरगुलबर्गारायचूर ह्या भागात प्रचारक राहिले. ते कुशल संघटक होते. उत्साही प्रशिक्षक होते आणि निष्ठावान स्वयंसेवक होते. उंचगोरेपानप्रसन्न व्यक्तीमत्त्वाचे भैयाजी जिथे जिथे गेलेतिथले लोक त्यांची आजही आठवण काढतात.

१९५८ ते १९७१ भैयाजींनीसिन्नर (नासिक)चिंचणी (ठाणे)जशपुरनगर (छत्तीसगड)वसईनिर्मळभुईगावकळंबवाघोली (ठाणे)कोंढ्ये (तालुका राजापूरजिल्हा रत्नागिरी) इत्यादी निरनिराळ्या गावांत शिक्षकाची नोकरी करून उपजीविका चालवली. स्वतःचे पायावर उभे राहूनराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम केले. ते उत्तम मल्लखांबपटूप्रशिक्षक आणि प्रणेते होते. संस्कृत साहित्याचा अपार अभ्यास आणि अनेकविध स्तोत्रांचे अफाट पाठांतर असल्याने त्यांना व्यक्तीस वश करून घेण्याची कला सुरेख साधलेली होती. आदर्श शिक्षकाचा जणू ते वस्तुपाठच होते. ह्या सार्या कौशल्याचा त्यांना संघकार्यात भरपूर उपयोग होत असे.

१९७१ सालच्या जून महिन्यातकोढ्ये येथील नोकरी सोडून ते जाणीवपूर्वक पूर्वांचलात गेले. प्रथम इंफाळमधील पंजाबी हायस्कूलमध्ये नोकरी केली. मग १९७३ च्या जूनमध्ये ते कोंढ्याच्या जयवंत कोंडविलकर ह्या बारा वर्षे वयाच्यासातवीत शिकणार्या मुलासहमणिपूर राज्यातीलउख्रूल जिल्ह्यातीलन्यू तुसॉम गावात एका ख्रिश्चन-उच्च-माध्यमिक-शाळेत नोकरी करू लागले. हे त्यांच्या शिक्षणाद्वारे-राष्ट्रीय-एकात्मता साधण्याच्या ध्येयास अनुसरूनच केलेले होते. उत्तम शिक्षण आणि बहिःशाल कार्यक्रमांद्वारे ते प्रथम विद्यार्थीप्रिय झाले आणि पुढे पालकांच्याही पसंतीस उतरले. मराठीकानडीहिंदीइंग्रजी,संस्कृतमैतेयी भाषांवर त्यांची उत्तम पकड असल्याने लोकांना समजून घेऊ शकले. त्यांच्याशी सुसंवाद करू शकले. शिवायप्रेमळआर्जवीआनंदी आणि उत्साही स्वभावामुळे ते लोकांच्या मनांत प्रवेश करू शकले. शाळेचे व्यवस्थापन ख्रिश्चन मिशनर्‍यांचे असून आणि भैयाजी स्वतः हिंदू असूनहीत्यांना वसतीगृहाचे पर्यवेक्षक नेमले गेले. पूर्ण वेळ मुलांसोबत राहून, पहाटेपासून मुलांना एकात्मतेची जाण दिली.भारतीयत्वाची जाण दिली. शारीरिक शिक्षण दिले. त्यांना मल्लखांब, निरनिराळे खेळ शिकवले. भारतीय भूप्रदेशांची, संस्कृतीची आणि प्रातस्मरणीय व्यक्तीत्वांची सम्यक ओळख करून दिली. आजारपणांत पालकांप्रमाणे शुश्रुषा केली. त्यामुळे ख्रिश्चनबहुल समुदायात त्यांचे अल्पावधीतच स्नेहबंध निर्माण झाले.

पूर्वांचलातील कामांत त्यांनी संघसंपर्कांचा मुळीच उपयोग केला नाही. कुठेही ते दीर्घकाळ राहिले नाहीत. त्यांना कायमस्वरूपी असे घरच नव्हते. गोळवलकर गुरूजींनी एकदा त्यांना विचारले, “भैय्यातू सारखा फिरत असतोसस्थिर का होत नाहीस?” तेव्हा भैय्याजी म्हणाले होते, “मी अनिकेत आहेपण स्थिरमति!” ह्याला गीतेच्या बाराव्या अध्यायातील एकोणिसाव्या श्लोकाची पार्श्वभूमी आहे. तो श्लोक असा आहेः

तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी संतुष्टो येनकेनचित् ।
अनिकेतः स्थिरमतिः भक्तिमान् मे प्रियो नरः ॥ - भगवद्गीता-१९-१२
म्हणजेच
निंदा स्तुति न घे मौनी मिळे ते गोड मानितो ।
स्थिर बुद्धि निराधार भक्त तो आवडे मज ॥ - गीताई-१९-१२

अनिकेतः स्थिरमतिः” हे भैयाजींनी केलेले स्वतःचे वर्णनच त्यांचे सर्वात यथार्थ वर्णन आहे. त्यामुळे अर्थातच ते भगवंतांचे प्रिय व्यक्ती असायलाच हवेत.

१९७३ च्या सप्टेंबरमध्ये त्यांच्या मातोश्री निवर्तल्याची तार आल्याने त्यांना नाईलाजानेच परतावे लागले. परंतु त्याही परिस्थितीत त्यांनीलालमोहन शर्मा ह्या मैतेयी आणि शंकन ह्या तांगखूल नागा मुलासही जाणीवपूर्वक सोबत घेतले. जयवंतही सोबत होताच. सांगलीत आईचे दिवस पूर्ण होताच त्यांनी स्वतः शिक्षकी पेशा पत्करला आणि मुलांना सोबत घेऊन राहू लागले. पुढे ह्या मुलांना घेऊन ते जेव्हा न्यू तुसॉमला परत गेले तेव्हा त्यांची प्रगती झालेली पाहून इतर पालकही आमच्या मुलांना घेऊन जा. शिकवा. असे मागे लागले. जास्त विद्यार्थ्यांची सोय करणे त्यांना आर्थिकदृष्ट्या झेपणारे नव्हते. पण असल्या बारक्या समस्यांना दाद देतील तर ते भैय्याजी कसले! त्यांनी सांगलीतील प्रतिष्ठित व्यक्ती व संस्थांनाही ह्या चांगल्या कामास हातभार लावण्यास विनंती केली. समाजानेही त्यांचा शब्द वाया जाऊ दिला नाही. मग १९९२ पर्यंत त्यांनी शेकडो विद्यार्थी महाराष्ट्रकर्नाटक आणि आंध्रात आणलेशिकवून मोठे केले आणि त्यांना प्रेरित करून पुन्हा पूर्वांचलात पाठवले. आज ते विद्यार्थीच जबाबदार नागरिक झालेले आहेत. त्यांचे उद्दिष्टास पुढे नेत आहेत.

१९९२ नंतर त्यांनी वानप्रस्थाश्रम पत्करला. एकाकी जीवन जगणे पसंत केले. कुठेही दीर्घकाळ राहिले नाहीत. कुणासही भारभूत झाले नाहीत. ते त्यांच्या स्वभावातच नव्हते. २६ ऑक्टोंबर १९९९ रोजीबंधूंचे घरीच कोल्हापूरातमेंदूतील कर्क अर्बुदा (ब्रेन ट्युमर) मुळे त्यांचा मृत्यू झाला. ही वार्ता कळली तेव्हा जागोजाग त्यांच्या विद्यार्थांना पोरके वाटू लागले. २६ ऑक्टोंबर २००० रोजी न्यू तुसॉम येथे झालेल्या श्रद्धांजली सभेत त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि गावकर्‍यांनी त्यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीचे शब्द मुळातच वाचण्यासारखे आहेत [१].

२००२ साली त्यांच्या एका मित्रानेश्री.अ.गो.कुंटे ह्यांनी त्यांचे एक चरित्र प्रकाशित केले. त्या पुस्तकात त्यांच्या कामाचे थोडक्यात वर्णन उपलब्ध आहे [२]. मात्रभैय्याजींसारख्या प्रसिद्धीपराङगमुख व्यक्तीचा माग काढणे मुळीच सोपे नाही. तरीही त्यांच्या लाखो चाहत्यांच्या मनांत त्यांच्या आठवणी सदैव ताज्या आहेत. त्यांचे विद्यार्थी आणि पुढे दहाहून अधिक वर्षे पूर्वांचलात राहून त्यांच्या कामास पूर्णत्व देणारे श्री. जयवंत कोंडविलकर यांच्या आठवणींवर आधारित उख्रुलचे आव्हान” [३] हे पुस्तकही मुळातच वाचनीय आहे. एवढेच सांगून ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण करतो. त्यांच्या कामाचे वर्णन करणारे ओज-शंकराष्टक आपणास सादर करतो!

संदर्भः
१.       एका शाळामास्तरची भारत परिक्रमादे.कों.सातभाईप्रकाशकः पूर्व-सीमा-विकास-प्रतिष्ठान१६ ऑक्टोंबर २००१पृष्ठसंख्या-१५२किंमतः रु.६०/- फक्त.
२.       अलौकिक कर्मयोगी स्वयंसेवकअ.गो.कुंटेप्रकाशकः जयवंत गणपत कोंडविलकर२४ जुलै २००२पृष्ठसंख्या-१३८किंमतः रु.६०/- फक्त.
३.       जयवंत कोंडविलकर यांच्या आठवणींवर आधारित उख्रुलचे आव्हानशब्दांकन पुरूषोत्तम रानडेपृष्ठसंख्या-५७. (हे पुस्तक अजून प्रकाशित झालेले नाही. वाटेवर आहे.)

ओज शंकरा

तुझीच ओज-शंकरास्मृती मनात वाहतो ।
समर्थ मातृ-भूमिलाजगात पाहु चाहतो ॥ धृ ॥

प्रसार संघशक्तिचाविचार भावला तुला ।
जगात आचरून प्रेममार्गपाय रोविला ॥
कसा मिळेल वारसा तुझाविचार राहतो ।
समर्थ मातृ-भूमिलाजगात पाहु चाहतो ॥ १ ॥

कधी सुरेल बांसरी, ’प्रहार’ तू प्रशिक्षिले ।
कुमारबालवा युवातुवा पुरे खुळावले ॥
व्यक्तीव्यक्तीशिबीर-साक्षतेच दीस शोधतो ।
समर्थ मातृ-भूमिलाजगात पाहु चाहतो ॥ २ ॥


कसाकुठेकधीकुणीविचार प्रेरिला मनी ।
अपूर्व-पूर्व अंतरा[१] न थोर मानले जनी ॥
तुझेच शिष्यचाहतेतुला मनात बाहतो ।
समर्थ मातृ-भूमिलाजगात पाहु चाहतो ॥ ३ ॥

तळात कोकणातुनीहि नागभूमि[२] गाठली ।
एकात्मता धरून नेम देशभक्ति पेरिली ॥
मितेयनागतांगखूलमुंबईस जोडतो ।
समर्थ मातृ-भूमिलाजगात पाहु चाहतो ॥ ४ ॥

ब्रम्हचर्यी कुणास काय प्राप्त होत संतती ।
तुला मुले अनेकती तुझेच नाव सांगती ॥
न पुत्र वागला कुणीअसाच निष्ठ राहतो ।
समर्थ मातृ-भूमिलाजगात पाहु चाहतो ॥ ५ ॥

निवासती मुलेमुलीअशी गृहेहि राखली ।
मुलांसपालकांसना मुळीच धास्ति वाटली ॥
जपेल पालकापरीअसे समाज मानतो ।
समर्थ मातृ-भूमिलाजगात पाहु चाहतो ॥ ६ ॥

मराठमोळकानडी असोहि तेलुगू कुणी ।
मितेयनागतांगखूलशिष्य सर्वही गुणी ॥
तुम्हास लोभलाखचीत ध्येय शुद्ध गाठतो ।
समर्थ मातृ-भूमिलाजगात पाहु चाहतो ॥ ७ ॥

असेच दीप दाखवूअशीच रीत नांदवू ।
एकात्मता फिरून, देशबांधवांत जागवू ॥
पथावरून जाऊ त्याचब्रीद हेच सांगतो ।
समर्थ मातृ-भूमिलाजगात पाहु चाहतो ॥ ८ ॥


[१]  मुंबई ते कोलकाता १,६६४ किमी अंतर, अधिक कोलकाता ते उख्रुल १,५७८ किमी अंतर, अधिक उख्रुल ते न्यू तुसॉम १०० किमी अंतर असे एकूण ३,३४२ किमी अंतर, भैय्याजींनी क्षुल्लक भासावे इतक्यांदा पार केले, इतक्यांदा शेकडो मुलांची तिथून इथवर ने-आण केली.
[२]  कोकणातील कोंढ्ये गावातून ते थेट मणिपूर राज्यातील म्यानमारच्या सीमेवरील न्यू-तुसॉम गावात, शिक्षणाद्वारे-राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याच्या आपल्या ध्येयाच्या साधनेकरता, १९७१ साली रवाना झाले होते.

20130312

देखण्या घुबडाची निर्मम हत्या



१८ डिसेंबर २०१२ रोजी सकाळचाच सुमार होता. एकदमच कावळ्यांची काव काव ऐकू येऊ लागली. खिडकीतून पाहतो तर शेजारच्या सोसायटीत स्टिल्टमध्ये एक देखणे घुबड बसलेले. भोवती सात आठ कावळे, काव काव करत त्याची पिसे ओढत होते.

ह्या फोटो नंतर मी अनेक फोटो काढले. त्रस्त झालेले घुबड जागा बदलत उंच उडून जाण्याचा प्रयत्न करत होते. कावळे त्याची पिसे ओढत होते. अखेरीस मी व्हिडीओ शुटिंगच सुरू केले.

मी असाही विचार केला की, निर्मम हत्या पाहत असता, शुटिंग कसले करायचे दळभद्र्यासारखे! त्यापेक्षा त्याला वाचवायला काय हरकत आहे? मग तोही प्रयास केला. पण आपला हस्तक्षेप केवळ त्याला दूर दूर नेऊन सोडतो आहे असे समजून आल्यावर, आणि दूरवरच्या सोसायट्यांत त्याचा पाठलाग करणेही शक्य नसल्याने, घरातूनच कॅमेर्‍याचे साहाय्याने जिथवर शक्य होते तिथवर वेध घेतला. हस्तक्षेप शक्य होत नव्हता.

मला हेही नीटसे कळेना की कावळे त्यावर इतका कडाडून हल्ला का करत आहेत? रात्री कदाचित जेव्हा कावळ्यांना अंधारामुळे काही दिसत नाही, तेव्हा हा त्यांची अंडी खात असू शकेल.

काय असेल ते असो. मात्र जेव्हा ते घुबड गंभीररीत्या जखमी होऊन, कॅमेर्‍याच्या नजरेबाहेर पडले तेव्हा, त्यातील क्रूरतेपोटी मला शुटिंग सुरू ठेवणे शक्यच राहिलेले नव्हते.

जीवो जीवस्य जीवनम्‌ ! हा तर जीवनाचा नियमच आहे. सुंदर दिसणारे देखणे घुबड, कावळ्यांकरता कदाचित क्रूर शत्रूही ठरत असेल. मात्र कावळ्यांच्या क्रूर हल्ल्यात ते ठार झाले हेही तर सत्यच होते.

मला प्रश्न पडला की, सत्य नेहमीच मनोहर असते का? चांगले असते का?
.

20130308

महिला वैज्ञानिक अनुपमा कुलकर्णी

अणू अविभाज्य ठरला तरीही तो, विजक (इलेक्ट्रॉन), धनक (प्रोटॉन) आणि विरक्तक (न्युट्रॉन्स) अशा कणांनी मिळून घडत असतो हे आपल्याला माहीतच असते. मात्र जेव्हा विश्वकिरणांचा म्हणजे अवकाशातून पृथ्वीवर येणार्‍या वस्तुमानधारी किरणांचा अभ्यास केला गेला तेव्हा अण्वंतर्गत इतर कणांचाही शोध लागत गेला.

इथे हे नमूद करावे लागेल की विख्यात अणुवैज्ञानिक डॉ.होमी भाभांनीही विश्वकिरण वर्षावांचा अभ्यास केलेला होता. गरम हवेच्या फुग्यांतून आकाशात उंचावर जाऊन त्यांनी हा अभ्यास केला. कारण विश्वकिरण पृथ्वीच्या वातावरणात प्रवेशताच, असे कण, आपली ऊर्जा गमावत जात. भूपृष्ठावर उतरता उतरता ते वातावरणास ऊर्जा वाटत गेल्यामुळे, अतिशय क्षीण होत जाऊन, कित्येकदा आपल्याला माहीत असलेल्या विजक, धनक आणि विरक्तक ह्या कणांत रुपांतरित होत असत. त्यामुळे विश्वकिरणांत नवीन कणच नाहीत असे भासे. म्हणून उंच पर्वतांवर, उंच हवेत, विमानांतून विश्वकिरणांचा अभ्यास केल्यास नवीन प्रकारचे कण आढळून येतील असा कयास वैज्ञानिकांनी केला होता. अभ्यासांनी तो खराही ठरवला.

त्या कणांपैकी जे सशक्त बलांनी बांधलेले असत त्यांना सशक्त-कण (हैड्रॉन) आणि जे अशक्त बलांनी बांधलेले असत त्यांना अशक्त-कण (लेप्टॉन) अशा प्रकारे वर्गीकृत करण्यात आले. एक कल्पना अशी मांडण्यात आली की, अशा मोठ्या आकाराच्या सशक्त-कणांना भरपूर ऊर्जा देऊन परस्परांवर आदळवल्यास कदाचित अतिशय भव्य आकाराचा मोठा कण प्राप्त होईल, ज्यापासून हे सगळे कण, आणि म्हणूनच हे विश्व निर्माण झालेले आहे. अशा भव्य कणाचे भाकीत अनेकांनी केलेले होते. तो कण, एका कादंबरीकाराच्या अभिव्यक्तीमुळे गॉड पार्टिकल किंवा ईश्वरी कण म्हणून विख्यात झाला. अशा कणाच्या शोधार्थ मग, जिनिव्हामध्ये एका प्रयोगाची निर्मिती करण्यात आली. त्याचे नाव भव्य-सशक्त-कण-टक्कर (लार्ज-हैड्रॉन-कोलायडर) प्रयोग असे ठेवले गेले. अनेक देश ह्या प्रयोगांत सहभागी झाले. भारतानेही त्यात सहभाग घेतला.

भारतातर्फे अनेक संस्थांतील अनेक तज्ञांची ह्या प्रयोगात काम करण्यासाठी निवड करण्यात आली. भाभा अणुसंशोधन केंद्रात कार्यरत असलेल्या ज्येष्ठ वैज्ञानिक अनुपमा पद्माकर कुलकर्णी यांचीही अशाच एका चमूत निवड करण्यात आली होती. आज डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या वतीने, जागतिक महिला दिनानिमित्त, डोंबिवलीतील सुयोग सभागृहात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात, त्यांचा सन्मान केला जात आहे.

साप्ताहिक सकाळच्या, २४-०९-२०११ च्या अंकात, यंग अचिव्हर्स सदरात करून देण्यात आलेली त्यांची ओळख त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख उभा करेल [१]. त्यानंतर ०९-०७-२०१२ रोजी श्री.सुधीर मुतालिक ह्यांनी ए ग्रेट कराडिअन म्हणून करून दिलेली त्यांची ओळखही बोलकी आहे[२]. टाईम्स.कंटेंट संकेस्थळावरील वृत्ताने प्रकाशचित्राद्वारे ही माहिती परिपूर्ण होते [३].

मुळात वैज्ञानिक म्हटले की त्यांना समाजात मान मिळायला हवा. पण तशी आपल्या समाजाची धारणा नाही. त्यात स्त्री-वैज्ञानिक तर अप्रसिद्धीच्या रुक्ष वाळवंटातच कायम काम करत असतात. टीव्ही-सिनेमातील कलाकारांइतकाही सन्मान आपला समाज त्यांना देत नाही. अशा परिस्थितीत ह्या निमित्ताने का होईना पण कर्तबगार स्त्री शास्त्रज्ञाचे कौतुक होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. आपला समाज त्यांना एरव्हीच्या दैनंदिन जीवनातही योग्य तो मान-सन्मान देईल, तोच दिवस खर्‍या आनंदाचा मानता येईल.

माझ्याकरता मात्र, ही घटनाही अधिक आनंदाचीच आहे. कारण, अनुपमा माझी विद्यार्थीनी आहे! सातत्याने, चिकाटीने आणि अथक परिश्रमाने, पुरूषी वर्चस्वातून मार्ग काढत, अनुपमाने समाजमनात आज मानाचे स्थान मिळवले आहे. तिची कहाणी उदयोन्मुख स्त्री शास्त्रज्ञांना प्रेरणादायी ठरो हीच सदिच्छा.

अनुपमाकष्टसातत्य आणि निदिध्यास यांचे बळावर खूप काही साध्य करता येते, याचे तू उत्तम उदाहरण आहेस! तुझे काम जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. त्या कामाने मी प्रभावित आहे. पुरूषांनाही अवघड वाटावे अशा परिस्थितींतून तू निर्भयपणे आणि धडाडीने काम केलेले आहेस. तुझ्या सहकार्‍यांनाही तुझ्याबद्दल जो आदर वाटतोत्यातून तुझ्या कर्तृत्वाची झलक पाहायला मिळते. भविष्यात नेत्रदीपक कामगिरी करण्याची संधी तुला मिळो हीच प्रार्थना! मला विश्वास वाटतोकी त्या संधीचे तू सोने करशील.


संदर्भ

१.      साप्ताहिक सकाळच्या यंग अचिव्हर्स सदरात करून देण्यात आलेली अनुपमा कुलकर्णी यांची ओळख http://www.saptahiksakal.com/saptahiksakal/20110924/4892827376573750178.htm
२.      श्री.सुधीर मुतालिक ह्यांच्या अनुदिनीवर अनुपमा कुलकर्णी यांच्या गौरवपर लिहिलेला लेख
३.     अनुपमा कुलकर्णी  यांबाबतचे वृत्त http://www.timescontent.com/syndication-photos/reprint/news/298277/dr-anupama-kulkarni.html